Tuesday, February 18, 2014

फॅन्टास्टीक फॅन्ड्री


फॅन्ड्री हा चित्रपट पाहणे हा एक विलक्षण अनुभव होता. भावुक पण तितकीच दाहक कथा, एकिकडे गावाकडचे मोकळे शिवार आणि दुसरीकडे बंदिस्त गावगाडा टिपणारा अप्रतिम कॅमेरा, कमीत कमी शब्दांत पण योग्य ते भाव देहबोलीतुन पोचवणारा कलाकारांचा अभिनय आणि या सगळ्यांवर नागराज मंजुळेंची दिग्दर्शकीय पकड या सगळ्या गोष्टी चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेतात आणि जागतिक दर्जा मिळवुन देतात. नागराजने स्वतः रंगवलेले चंक्या नावाचे पात्र त्यांच्या बहुगुणी कर्तृत्त्वाची सार्थ ओळख करुन देते.

मराठी चित्रपटांच्या सरकारपुरस्कृत भाऊगर्दीत असा बावनकशी जागतिक दर्जाचा चित्रपट पाहायला मिळेल अशी आशा मी अलीकडं सोडुन दिली होती. पण नागराज मंजुळेंनी अनपेक्षित धक्का दिला. फॅन्ड्रीचं समिक्षकांनी चौफेर कौतुक केलं आणि मराठी रसिकांनीपण पहिल्या तीन दिवसात दिड कोटींचं माप त्याच्या पदरात टाकलं.

प्रोमोजमुळे टाईमपास सारखा पौगंडावस्थेतील प्रेमकथा वाटणारा हा चित्रपट पात्रांच्या अंतरंगात शिरत, गावातल्या सामाजिक घडामोडी टिपत शेवटाला पोचला तेव्हा चित्रपटांवर आणि माणुसपणाच्या गोष्टींवर प्रेम करणारा माझ्यातला प्रेक्षक नागराज मंजुळे नावाच्या रसायनाच्या प्रेमातच पडला.  

बऱ्याच प्रेक्षकांची अवस्था जे समोर दिसतंय तेव्हढंच ते नाही हे जाणवतं, पण काय ते कळत नाही. अन्याय, अत्याचार असेल असं वाटलं. पण तसं काहीच नाही. फक्त पिक्चर संपल्यावर पुढे काय झालं असेल या विचाराने छळ होत राहतो (मायबोली.कॉम वरुन) अशी झाली.

मला वाटतं नागराजला या कथेत अन्याय, अत्याचार असा मेलोड्रामा दाखवायचा नाहीये. त्याच्या कथेतला तो ग्रामिण समाज उत्पन्नाचे अन्य पर्याय शोधण्याइतका प्रगत तर आहेच पण तितकाच सावध आणि संतुलितपण आहे. मग ती पाटलाची प्रतिक्रीया असो किंवा गुरुजींचं शाळेतलं वागणं. म्हणुनच चित्रपटातला कचरु माने (किशोर कदम) गावातल्या लोकांशी सलोख्याचे संबंध राखत सगळं सहन करु शकतो. पण त्याचवेळी जातिपातीवरुन हेटाळणी करणारे संग्राम पाटील आणि त्याच्या मित्रांसारखे काही समाजघटक एखाद्या जब्याचे भावविश्व उद्ध्वस्त करतात. आणि अशा वेळी आजुबाजुचा समाज फक्त बघ्याची भुमिकाच घेतो.
आपल्या आसपास सहज घडु शकणाऱ्या या गोष्टीतलं दुर्मिळ सौंदर्य टिपण्याची शब्दातीत किमया नागराज मंजुळे आणि त्याच्या टिमला जमुन गेली आहे हे नक्की.

No comments: