Tuesday, September 23, 2008

सज्जनपूर आणि वळू

नुकताच श्याम बेनेगल यांचा "वेलकम टु सज्जनपूर" बघितला. पिक्चर एकदम झक्कास! नकळत मराठीतल्या वळुशी तुलना झाली. आता चित्रपटातल्या (मुख्यत: तथाकथित व्यावसायिक आणि विनोदी) कल्पनांना फारसं तर्कनिष्ठ दृष्टीनं (लॊजिकली) बघू नये असं म्हणतात. म्हणजेच त्यांचं "चित्रपटीय स्वातंत्र्य"(सिनेमॅटीक लिबर्टी) जरी मान्य केलं तरी या दोन विनोदी चित्रपटांच्या विषय व पात्ररचना यांबाबतीत मला काही निरीक्षणं नोंदवावीशी वाटतात.
"वळू" काही अंशी उगीचच "गावच्या लोकांचे व गावातल्या वातावरणाचे थटटास्पद चित्रण" असल्यासारखा वाटतो. आता काहींच्या मते उपहासात्मक विनोद हाच तर अशा विनोदी चित्रपटांचा गाभा असतो. पण विनोद परिस्थितिजन्य असेल तर जास्त भावतो. शिवाय वळुमधली पात्रे काहीशी संदर्भहीन व उथळ म्हणजेच वळुला पकडण्यासाठी पकडून आणलेली गर्दी असल्यासारखी वाटतात. "वळू" मध्ये मुख्य विषय धर्माशी निगडित असूनसुद्धा, विषयाची धार्मिक बाजू काहीच धुंडाळलेली दिसत नाही. वळुबद्दलच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा, यांमधला संघर्ष असे परिमाण कथेला देता आले असते. धर्माशी निगडित असलेलं एकमेव पुजाऱ्याचं पात्र विदूषकाच्या पातळीवर आणून ठेवलं आहे. गावकऱ्यांना त्या वळुचा होणारा त्रास हा चित्रपटात कुठचं प्रकर्षानं जाणवत नाही. दिग्दर्शक म्हणतात त्याप्रमाणं "एखाद्याच्या स्वातंत्र्यावर उगीचच निर्बंध लादण्याची मॊब सायकॊलॊजी" (नेमकं माहीत नाही, असंच काहीसं चू. भू. दे. घे. ) हेसुद्धा त्या प्रकर्षानं जाणवत नाही. पडद्यावर जे प्रामुख्यानं दिसतं ते म्हणजे त्या वळुला पकडण्यासाठी आणि त्यानिमित्ताने प्रसिद्धी मिळवण्यासाठी (डाक्युमेंट्री) गावकऱ्यांची चाललेली आचरट धडपड आणि त्यामध्ये डोकावणारं विनोदी राजकारण. दिग्दर्शकांच्या मताप्रमाणचा विषयाचा सीरियस दाखवणारी दोनचं पात्र, वळुच्या बाजूनं असलेली, जीवन्याची आई आणि वेडी. पण तीसुद्धा त्या धरपकडीच्या जत्रेत हरवल्यासारखी वाटतात.

त्यामानाने "सज्जनपूर" गाव बहुरंगी आणि बहुढंगी आहे. गावातल्या ग्राम्यजीवनाच्या सर्व अंगांना, म्हणजेच राजकारण (सरपंच निवडणुक), धर्म (महंमद), जातपात (अहिरवार-जमीनदार), श्रद्धा-अंधश्रद्धा (कुत्र्याशी लग्न, देवाचं पत्र), अलुते-बलुतेदारांची वाताहत (सपेरा), नोकरीसाठी शहरवासी झालेल्या कुटुंबांची दुरवस्था (कमला, मौसी) इत्यादी सगळ्यांना, (पुसटसे का होईना) स्पर्श करण्यात "सज्जनपूर" यशस्वी होतो. तेही कुठल्याही अंगाबद्दल प्रचारकी न होता. गावातली सगळी पात्रं खूपच खरीखुरी वाटतात. पात्रांची सुष्ट-दुष्टं रुपं आहेत. महादेव ह्या मध्यवर्ती पात्राभोवती चित्रपट फिरता ठेवला आहे आणि बाकी पात्रे ठराविक उद्देशानेच पडद्यावर येतात. तरीही सगळी पात्रे गावच्या रचनेतील त्यांचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्यात व गावचे वास्तववादी चित्र पूर्ण करण्यात यशस्वी होतात.

आता चित्रपट म्हणून "सज्जनपूर" वातावरणनिर्मितीसाठी (गाण्यांच्या भडिमाराबरोबर) खूप वेळ घेतो, ज्यामुळे चित्रपटाच्या पूर्वार्धात प्रेक्षकांचा काहीसा रसभंग होतो.

Tuesday, September 16, 2008

फेमिनाइन कोशंट

गाडी फाटकाबाहेरच्या ट्रॅफिकमध्ये आणि प्रदूषणाच्या ढगामध्ये पोचली आणि तिच्या विचारांची टकळी सुरू झाली.

आता मला कुठला मुलगा आवडतंच नाही हा माझा दोष आहे का? "बघितलेली" सगळी एकजात बावळट तरी वाटतात किंवा "ध्यान" दिसतात. आजूबाजूला दिसणाऱ्यांपैकी जी आवडतात ती अगोदरपासूनच कुठल्यातरी बावळट पोरीच्या प्रेमाततरी असतात नाहीतर "विवाहित". उगाचच "वय वाढतंय" या सबबीखाली कोणाशीही लग्न करायचं का? आणि नाहीच करावसं वाटलं लग्न तर बिघडतं कुठे. हे जेव्हा आई बाबांसमोर बोलले तेव्हा सहा रिश्टर स्केलपेक्षा मोठा भूकंपाचा धक्का बसावा अशी प्रतिक्रिया सर्वांनी दिली होती. सगळे मिडियावाले विनाकारण एकविसाव्या शतकाच्या गप्पा मारतात. जरा मध्यमवर्गियांच्या मनात डोकावून बघा म्हणावं, अजून पेशवाई जशीच्या तशीच आहे.

चहाच्या वेळी आमच्या ग्रुपमधल्या त्या पढीक मूर्खाच्या (हे मी त्याला ठेवलेलं नाव) विश्लेषणाचं गटार परत वाहू लागलं. प्रत्येक गोष्टीचा कीस पाडणे (त्याच्या शब्दात ऒब्जेक्टीव ऍनॅलिसिस करणे) हा त्याचा आवडता छंद आहे. तर आज महाशय म्हणाले आजकाल बऱ्याच पोरींचा फेमिनाइन कोशंटच कमी होत चाललाय. विशेषत: आयटीमधल्या पोरींचा. कुठल्यातरी परदेशी संशोधनाचे दाखले देत याचं विश्लेषण सुरू झालं. कशा आजच्या मुली मुलींसारखं वागणं विसरल्या आहेत. हे निसर्गाच्या कसं विरुद्ध आहे वगैरे. बासचं. आम्ही सगळ्याजणी भांड भांड भांडल्यावर, दृष्टिकोन (perception) वेगवेगळे असू शकतात अशी तात्त्विक पिंक टाकून त्यानं काढता पाय घेतला.

जाग्यावर येऊन बसले. घड्याळाप्रमाणे बरोबर पंधराच मिनिटांनी जागेवर बसत होते तरी लीडबाबा (आमचा प्रोजेक्ट लीडर) "आली चहाच्या निमित्तानं तासभर चकाट्या पिटून" असा नेहमीचा लुक दिला. टीममधली शिला जवळ येऊन सांगू लागली. अग त्या टोपीने काहीच नीट काम केलेले नाहीये. टोपी म्हणजे आमच्या टीममधला स्वयंघोषित डॊट नेट एक्स्पर्ट. तिला म्हणजे त्या टोपीला खाऊ का गिळू असं झालं होतं. एकावेळी दोन दोन प्रोजेक्टवर काम करत असल्यामुळे बरचसं काम याच्याकडून करून घ्यायची जबाबदारी मॅनेजरने आमच्याकडे दिली होती. शिकवण्याच्या हजारएक पद्धती आम्ही दोघींनी आळीपाळीने त्याच्यावर अमलांत आणल्या होत्या. शिला एकदा म्हणाली मी माझ्या लेकालापण त्याच्या पाच वर्षाच्या आयुष्यात एवढ्या प्रेमानं कधी काही सांगितलं नाही. पण त्याचं कामाचं घोडं कुठ अडत होतं काय माहिती! मॅनेजरसाहेबांकडे जाणं भागच होतं. आता तो, आम्ही दोघी आणि न्यायाधीश मॅनेजरसाहेब असा खटला चालू झाला. खूप वादावादी झाली. साहेबांचा पेशन्स जसा जसा संपत होता तसतसा त्यांचा आवाज वाढायला लागला. तरी टोपी काही समेवर यायला तयारच नव्हता. शेवटी साहेबांचा आवाज कॊर्पोरेट संस्कृतीला विसंगत इतका मोठा आणि घोगरा झाल्यावर टोपी बरळला, मला मुलींच्या प्रोजेक्टवर कामच करायचं नाही. आमच्या दोघींच्या डोक्यात शंभर सूर्यांएवढा लख्ख प्रकाश पडला. हसावे की रडावे काहीच कळत नव्हते. काही म्हणणं तर दूरचं राहिलं. प्रसंगावधान राखून शीलाने दुसऱ्या प्रोजेक्टवर महत्त्वाचा कॊल आहे असं सांगितले आणि आम्ही दोघी तिथून बाहेर पडलो. जागेवर येऊन पाच मिनिटं आम्ही काही न बोलता एकमेकींकडं बघत बसलो होतो.

त्या नवीन मॅनेजरकडे जाऊन त्याला परत एकदा आठवण करून दिली. साईटवर कमिशनिंगसाठी पाठवणार म्हणून (मनातल्या मनात: गाजर दाखवून) एक महिना झाला होता त्याची. अजून कशी काही हालचाल नाही म्हणून विचारलं तर म्हणाला बरं झालं आलीस. तुझ्याकडून काही गोष्टी कंफर्म करायच्या होत्या. म्हणजे साईटवरच्या कामात बरेच धोके असतात. बरंच शारीरिक कष्टाचं काम असतं. उंचावर जावं लागत. तासतासभर उभारावं लागतं. आता तुला जमणार नाही असं मला म्हणायचं नाही पण परत एकदा कंफर्म करायचं होतं. मी एन. सी. सी., युथ एक्सचेंज इत्यादी कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्व तथाकथित पुरुषी कसरती करून आले आहे हे फिरून एकवार त्याला सांगितलं. सर्टिफिकेटं आणून दाखवू का, एवढंच विचारायचं बाकी राहिलं होतं. तरी मुलींकडून डबल कंफर्मेशन घेणं गरजेच आहे असं विकट हास्य करत तो बोलला.

बरोबर साडेपाच वाजता काम उरकून मशीन बंद करणार इतक्यात मी निघणार हे अंतर्ज्ञानानं कळल्यासारखा लीडबाबा उठून माझ्या जागेवर आला आणि एक महत्त्वाचं काम समजावून द्यायला लागला. निघायच्या वेळेसच महत्त्वाची कामं डिस्कस करण्याची याची सवय आता चांगलीच माहिती झाली होती. त्याला तोडत मी आजच काम झालंय हे उद्या केलं तर नाही चालणार का? असं विचारलं तेव्हा त्यानं एकवार घड्याळाकडं आणि एकवार माझ्याकडे बघितलं. घड्याळाच्या काट्याबरोबर यायचं आणि जायचं अस कस चालेल आयटी कंपनीत. एवढ्या लवकर जायचं तर तुम्ही येताच कशाला आयटी कंपनीत. येऊन आमच्यावर काय उपकार करता का तुम्ही. या अर्थाचे सगळे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले. पण प्रत्यक्षात माझ्या कामाच्या काटेकोरपणामुळे ठीक आहे एवढंच तो म्हणू शकला.

पार्किंगमधून गाडी बाहेर काढताना, विश्लेषणवीर पढीक बाय करून गेला आणि "फेमिनाइन कोशंट" आठवला. विचारांची टकळी पुन्हा सुरू झाली. समान वागणुकीच्या बोंबा तर मारायच्या पण नेहमी उपकार करत असल्याची, सांभाळून घेत असल्याची, फेवर करत असल्याची भावना. नोकरीवालीच बायको पाहिजे पण तिचा पगार आपल्यापेक्षा जास्त असता कामा नये. मुलींच्या प्रोजेक्टमध्ये काम करायचं नाही. लीड म्हणून मुली नकोत. यांची चार चार पोरं कमिशन साईटवर राडा करून आलीत पण आम्हाला मात्र संधी न देताच आमच्या कुवतीवर शंका घ्यायची. त्या शीलाचा नवरा फक्त सकाळी उठल्यावर चादरीच्या घड्या घालतो आणि चहा करतो पण मित्रमंडळीमध्ये बायकोला घरकामात पूर्ण मदत करतो असं सांगत फिरतो. हे लोक ऒनसाईटवर डाळभात खाऊन जगणार आणि सगळा स्वयंपाक येत असल्याच्या तोऱ्यात मिरवणार. व्यवस्थित प्लॅन करून, वक्तशीरपणे कामं करता येतात. पण जेव्हा सगळं ऒफिस रिकामं होणार असतं तेव्हाच हे अगदी मन लावून काम करणार. जणू काही ते वेळेत घरी गेले तर दुसऱ्या दिवशी सकाळी कंपनीचा स्टॊक मार्केटवरचा शेअर खालीच घसरणार आहे आणि तो वरती रोखून धरायचं काम यांना रात्री उशीरापर्यंत करायचंय. काम करायला ऒक्सिजन (आग आणि मूर्ख विरुद्ध टोकाला असणारी तंबाखूची कांडी) लागतो असं म्हणत दर तासाला पंधरा पंधरा मिनिट गायब राहणार. मग काय हे लोक बारा बारा तास ऒफिसमध्ये बसलेले दिसणारंच. आम्ही पाच मिनिट मोबाईलवर आलेला कॊल घ्यायला जागेवरून उठलं की यांच्या डोळ्यावर येणार. पण प्रोजेक्ट डिस्कशनच्या नावाखाली तासतासभर क्रिकेट, स्टॊक मार्केट, रिअल इस्टेटपासून मोबाईल, कार्स, कपडे, हेअरस्टाइल यापर्यंत सगळ्या विषयांवर गप्पा मारत बसणार.

मेट्रोसेक्शुअल मेल असं म्हणत यांचा फेमिनाइन कोशंट वाढत चाललाय. मग मुलींचा कमी झालेला दिसला तर बिघडलं कुठं?

Sunday, September 14, 2008

उत्तर

काहीतरी करत राहणं महत्त्वाचं. मोकळ्या वेळी पहिल्यांदा मनात जे येईल ते सुरू करावं. नंतर कदाचित मन पलटी मारेल आणि काहीतरी वेगळं करावंस वाटेल. पण मग लगेच ते नवीन काहीतरी करणं उत्तमच. म्हणजे किचन साफ करताना काही वाचावंसं वाटलं किंवा मेल चेक करता करता झोपावं वाटलं किंवा अभ्यास करता करता काही लिहावंसं वाटलं. या सर्व वेळी हातातलं सोडून नवीन करणं म्हणजे त्या क्षणाला पूर्णपणे न्याय देणं. वर्तमानात जगणं. भारंभार पुस्तक वाचून किंवा चित्रपट बघून, लिखाणासाठी काही सुचलंच पाहिजे हे चुकीचंच. आणि त्याचा वेगळं काहीतरी घडण्याशी संबंध अजिबात नाही. वर्षानुवर्ष एकच काम करत राहणाऱ्या काही व्यक्तींकडूनसुद्धा साहित्यनिर्मिती झाली असेलच. म्हटलं तर वेगळं असं कधीच काही घडत नसतं. म्हटलं तर प्रत्येक क्षण नित्यनूतन आहे. बऱ्याच वेळेस काहीच वेगळं न वाटणं हिसुद्धा एक संवेदनाच. आपल्या वाढलेल्या अनुभवातून, त्यातून घेतलेल्या धड्यातून तयार झालेली. वेगळं म्हणजे कदाचित आपल्या पंचेंद्रियांच्या वेगवेगळ्या अनुभवातून तयार होऊ शकणाऱ्या असंख्य कॊंबिनेशनमधलं, मेंदूमध्ये न साठवलेलं एक कॊंबिनेशन. मेंदू कदाचित अतिशहाणपणाने त्या कॊंबिनेशनला वेगळं ठरवत नसेलही. पण ते कॊंबिनेशन तो मेंदू साठवणार हे नक्की आणि परत कधी त्याला उपरती झालीच तर "त्यावेळी आपण वेगळं काहीतरी अनुभवलं" अशी आठवण नक्की करून देणार. लिहिण्याची अथवा निर्मितीची प्रतिभाषक्ती कुठूनही येवो, देवाच्या प्रसादातून किंवा आपल्या प्रयत्नातून, आपण फक्त तिला शरण जाऊन आपलं निर्मितीचं काम करत राहायचं. चांगलं, वाईट कुणी काहीही म्हणो, कुणी छापो न छापो अथवा विको न विको आपण फक्त आपल्याला आनंद देईल ते काम करत राहावं. मग यात त्या प्रसाद वाटणाऱ्या देवाच्या किंवा निसर्गाच्या अस्तित्वाचा मुद्दा कुणी कसाही मांडला तरी फरक काय पडतो.

प्रश्न काय पडत राहणार. एखाद्या प्रश्नाचं उत्तर देताना आणखी एखादा प्रश्न पडणं हे कदाचित त्या प्रश्नाला साजेसं उत्तरचं. शैक्षणिक पात्रता किंवा नोकरी किंवा पगार याचा बुद्धीशी संबंध असेल कदाचित पण बुद्धीचा संबंध पडणाऱ्या प्रश्नांच्या संख्येशी नक्कीच नसावा. असला तरी मग असं म्हणावं लागेल की बाकीचे दुर्दैवी आहेत की त्यांना आपल्याएवढे प्रश्न पडत नाहीत. या प्रश्न पडण्याचा एकटेपणाशी संबंध नसावाच बहुतेक. कारण संसारात रमलेल्या, एखाद्या गोष्टीत गुंतलेल्या लोकांना कुठलेच प्रश्न पडत नाहीत असे अशक्य आहे. त्यांचे प्रश्न निराळे असतील. आता एकटेपणा हा बहुतेक मनातल्या तुटलेपणाच्या अवस्थेशी जोडलेला आहे. आपण जितके स्वत:ला इतरांपासून वेगळे समजू, निसर्गापासून वेगळे समजू, जितकी आपली दु:ख आपल्याला वेगळी वाटतील, जितकी ती आपण स्वत:जवळ ठेवू आणि त्यांच्या चक्रव्यूहात अभिमन्यूसारखं अडकण्यात आणि दु:खरुपी कौरवांकडून संहारीत होण्यात धन्यता मानू, तेवढी आपली एकटेपणाची भावना अधिक. व्यक्तिस्वातंत्र्याच्या, स्वतंत्र विचारांच्या या कल्पनांचा आधुनिक, अवास्तव आविष्कारसुद्धा कारणीभूत आहे या एकटेपणाच्या भावनेला. व्यक्ती म्हणून स्वातंत्र्य उपभोगण्याच्या नावाखाली आणि विचारांच स्वातंत्र्य जपण्याच्या नावाखाली आपण आपल्याच माणसांपासून, निसर्गापासून तोडले गेलो तर एकटं वाटण अपरिहार्यच. शिवाय एकटेपणा संपवण्यासाठी कुठल्यातरी गोष्टीत, छंदात स्वत:ला यंत्रवतपणे गुंतवून घेतल्यामुळं हा एकटेपणा संपणार नाही हे नक्की. त्यासाठी कुठंतरी मनाच्या तारा जोडता आल्या पाहिजेत. मग भले ती गोष्ट निर्जीव असेल. निर्जीव विषयांवरच्या संशोधनात आयुष्य कारणी लावणाऱ्या संशोधकांची उदाहरणं काही कमी नाहीत. खूप विचारांनी येत असेल एकटेपणा, पण विचार योग्य दिशेनं प्रवाही ठेवले तर बहुतेक खूप विचार खूप लाभदायकच ठरतील. मग विचारांचं मोजमाप गौणंच ठरतं. फक्त तुटलेपण टाळता आलं पाहिजे. शेवटी काय, खूप पूर्वी आपल्या पूर्वजांनी म्हटल्याप्रमाणे आपण एकटे नसतोच कधी. सगळं चराचर म्हणजे आपणच असतो. आपणच या सगळ्या जगात सामावलेलो आहोत आणि आपल्यातच सगळं जग सामावलं आहे.

प्रश्नही आपलेच. उत्तरही आपलंच. सगळं एकच आहे. सगळं एकच तर आहे.

(प्रेरणाः मिलिंद बोकील यांची "एकम")

Wednesday, September 10, 2008

प्रश्न?

आता वाचावं की लिहावं की झोपावं की मेल चेक करावे की चॅटिंग करावं की किचन साफं करावं की लॊंड्रिचे कपडे आवरावे? वाचायचं तरी काय? कथा की कादंबरी की साधना की वाचायची राहिलेली वर्तमानपत्रं की अभ्यासाचं काही? आवराआवरीच्या कामाचा एवढा कंटाळा का येतो? आणि संध्याकाळीच ऒफिसमधून निघताना मेल चेक करून झाल्यानंतर मधल्या वेळात आपल्याला कोण मेल करणार आहे? आणि चॅटिंगला सगळी दररोज भेटणारी मित्रमंडळी, वेगळं काय चॅट करणार? पण झोपलो तर मग लिहिणार कधी? आणि लिहायचं तरी काय? एवढी निरनिराळी पुस्तकं वाचून आणि चित्रविचित्र पिक्चर्स बघूनसुद्धा लिहायला काहीच का सुचत नाही? आयुष्यात काही वेगळं घडत नाही म्हणून का? पण मग वेगळं म्हणजे काय? सदासर्वदा असंतुष्ट कस्टमरची नवीन मागणी म्हणजे वेगळं का? प्रोजेक्टमधला नवीन बग म्हणजे वेगळं का? वेगळा प्रोजेक्ट म्हणजे वेगळं का? वेगळी कंपनी म्हणजे वेगळं का? ऒफिसमध्ये दिसणाऱ्या नवीन पोरी म्हणजे वेगळं का? वेगळ्या विषयाचं अथवा कथेचं पुस्तक, नाटक किंवा चित्रपट म्हणजे वेगळं का? रोज रस्त्यावर वाढणारं ट्रॅफिक म्हणजे वेगळं का? का वेगळेपणाची संवेदनाच बोथट झाली आहे? बधिर झाली आहे? पण मग वेगळं म्हणजे तरी काय? जे तुम्ही आधी कधी अनुभवलं नाही ते म्हणजे नवीन अनुभव म्हणजे वेगळं का? पण मग नवीन अनुभव म्हणजे काय? जे तुमच्या पंचेंद्रियांना आधी कधी जाणवलंच नाही ते म्हणजे नवीन का? की त्या इंद्रियांच्या माध्यमातून तुमचा मेंदू ठरवतो ते म्हणजे नवीन? पण मग मेंदू याबाबतीत अतिशहाणपणा करत नसेल कशावरून? ओव्हरकॊंफिडंटली वागत नसेल कशावरून? पण मग लिहायची वगैरे प्रतिभाशक्ती आभाळातून पडते का? खुपजण म्हणतात तशी ती देवाचा प्रसाद असते का? आणि मग तो प्रसाद आपल्यालाच मिळाला आहे हे कसं समजणारं? काहीजण आपण लिहू किंवा बनवू ते छापतील किंवा विकतील म्हणून? की काहीजण त्याला चांगलं म्हणतील म्हणून? पण मग आज वाईट ठरवलेलं उद्या चांगलं वाटायला लागलं तर? म्हणजे चांगलं वाईट असं काही नसतंच तर मग कुणाला देवाचा प्रसाद मिळालाय आणि किती मिळालाय ते कसं ठरवणार? पण मग अशा बऱ्याच प्रतिभावंतांनीच देवाचं अस्तित्वच का नाकारावं?

मला एवढे प्रश्न का पडतात? हा काय प्रश्न झाला? आता माणसाला बुद्धी आहे म्हणूनच तर प्रश्न पडतात की नाही? पण मग मलाच का एवढे प्रश्न पडतात? मला जास्त बुद्धी आहे म्हणून? माझ्या शैक्षणिक पात्रतेकडं आणि नोकरी व पगाराकडं बघून कुणी असं म्हणेल का? पण मग माझ्यापेक्षा हुशार लोकांनापण किंवा इतर बाकीच्यांना प्रश्न का नाहीत पडत? मलाच का पडतात? मी असा एकटा आहे म्हणून? पण मग ऒफिसमध्ये, बाहेर एवढ्या लोकांमध्ये मी असतो मग मी एकटा कसा? ऒफिसनंतरसुद्धा फोनवर, नेटवर लोकांच्या संपर्कात असतोच मग मी एकटा कसा? फक्त लग्न झालं नाही म्हणून एकटा? कुणाबरोबर राहत नाही म्हणून एकटा? तसं नसेल तर मग एकटेपणा म्हणजे काय? तो का येतो? मुळात तो असतोच का येतो? आणि तो असतो किंवा येतो तो कशामुळे? आणि तुम्ही स्वतःला कशाततरी गुंतवून घेतल्यावर तो कमी होतो का? मी खूप विचार करतो म्हणून येतो का एकटेपणा? पण मग बुद्धी आहे म्हटल्यावर विचार येणारच की नाही? का मी अती विचार करतो? आता बरेचजण म्हणतात देखिल मी अती विचार करतो म्हणून, पण मग अती म्हणजे किती? योग्य विचार म्हणजे किती विचार? कसे मोजणार हे विचार? आणि असं आयक्यू किंवा इक्यू सारखं मोजमाप असतं का विचारांचं? मोजणं शक्य झालं तरी जर आयक्युसारखं विचारांचं प्रमाण कमीजास्त करता येणारं नसेल तर काय? मग या विचारांचं आणि पर्यायानं प्रश्नांचं काय करायचं? मुळात त्यांचं काही करता येणार आहे का?

आता हे सगळं लिहून टाकलं तर कुणी वाचेल का?

(प्रेरणाः मिलिंद बोकील यांची "एकम")